महाराष्ट्र

भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचाही गळा घोटला : संजय राऊत

मुंबई : शिर्डीतील साईबाबा संस्थानने मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचाही गळा घोटला असे ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.’ असे म्हणत राऊत यांनी याचे खापर राज ठाकरे यांच्यावर फोडले. सर्व भोंगे उतरवा असं बाळासाहेब ठाकरे कधीच म्हणाले नव्हते, असंही राऊत यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काकड आरती आणि शेजारतीच्यावेळी स्पीकर बंद ठेवण्यात येणार असल्याचे शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या आरत्या स्पीकरवर गावाला ऐकवल्या जातात. पहाटे पाच वाजता भूपाळी होते. सव्वा पाच वाजता काकड आरती केली जाते. तर रात्री दहा वाजता शेजारती होते.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही ही परंपरा सुरूच होती. मात्र, आजपासून ती खंडित करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सर्व धार्मिक स्थळांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार साई मंदिरासह सर्वच धार्मिक स्थळांनी पहाटे आणि रात्री ध्वनिवर्धक न लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. शिर्डी हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. येथील आरत्यांच्या स्पीकरवर कोणी कधीही हरकत घेतली नव्हती. आता मात्र महत्वाच्या आरत्यांच्यावेळी स्पीकर बंद राहणार असल्याने त्या मंदिर परिसरात आणि शहरातही ऐकता येणार नाहीत. दुपारची आरती आणि सूर्यास्ताच्या वेळची धुपारती यावेळी मात्र स्पीकर सुरू राहणार आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये