वडगाव शेरीतील रस्त्यांसाठी तात्काळ बोटींची व्यवस्था करा; नगरसेवक सुहास टिंगरे यांची उपरोधिक टिप्पणी

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एनडीएमए अंतर्गत विविध विकासकामांचा गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून, मागील पाच महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही हा विषय वारंवार मांडण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही बहुतांश कामे रखडलेली असल्याबद्दल स्थायी समिती सदस्य व नगरसेवक सुहास टिंगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जून २०२४ मध्ये एनडीएमए अंतर्गत पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांवरील कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, आजतागायत बहुतांश ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. ज्या ठिकाणी कामे सुरू झाली आहेत, तेथेही मागील काही दिवसांपासून कामे पूर्णपणे बंद असून, अनेक रस्त्यांनी नदी-नाल्यांचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या वडगाव शेरी मतदारसंघात मोठ्या संख्येने वारकऱ्यांच्या दिंड्या मुक्कामी आल्या आहेत. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत सुहास टिंगरे यांनी आजच्या साप्ताहिक स्थायी समिती बैठकीत प्रशासनाला उपरोधिक टोला लगावला.
“वडगाव शेरीतील रस्त्यांची अवस्था पाहता नागरिक आणि वारकऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने किमान तात्काळ बोटींची व्यवस्था तरी करावी,” असा उपरोधिक चिमटा त्यांनी काढला. या माध्यमातून प्रशासनाने झोपेतून जागे होऊन रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवावा आणि पूरस्थिती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.



