वारजे साहित्यिक कट्टा हा मनावरील ताण दूर करणारा कट्टा : श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य

वारजे : pune city, warje पूर्वी खेडेगावात शेतातून काम करून आल्यानंतर गावातील लोक संध्याकाळी झाडाच्या खाली असणाऱ्या पाराच्या कट्ट्यावर बसत व एकमेकांच्या हिताच्या गोष्टी करत, त्यामुळे त्यांचा दिवसभर शेतात केलेल्या कामांचा ताण दूर होत. हा कट्टा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली असल्यामुळे त्यातून त्यांना ऑक्सीजनही भरपूर मिळयाचा. त्याचप्रकारे वारजे साहित्यिक कट्टा हा मनाची कमतरता दूर करणारा कट्टा आहे. असे मत श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ करवीर उपपीठ दक्षिणात्य श्री शारदा पीठम शृंगेरी श्री प.प. विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी व्यक्त केले
पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वारजे साहित्यिक कट्ट्यावर दिगंबर जोशी लिखित सार्थ भर्तृहरी त्रिशतक व गुंफण या भर्तृहरीच्या तीन शतकांवर भाष्य करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यावाचस्पती रामचंद्र देखणे, ज्येष्ठ कवियत्री ज्योत्स्ना चांदगुडे,ज्येष्ठ साहित्यिक माधवी वैद्य, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, दिगंबर जोशी, दीपा जोशी आदी उपस्थित होते.

विद्यानृसिंह भारती स्वामी पुढे म्हणाले, भर्तृहरीच्या तीन शतकांमध्ये नीती, शृंगार आणि वैराग्य याबाबत सांगितले आहे. नीती शतकांमध्ये धर्माचा पाया बळकट कसा करावयाचा, नीतिमत्ता कशी ठेवायची हे सांगितले असून शृंगार मध्ये नीतीमुळे सजणारा अध्यात्माचा शृंगार सांगितला आहे व त्यात गुंतून न पडता वैराग्याकडे कसे पाहावे हे वैराग्य मध्ये सांगितले आहे. या त्रिशतकांवर दिगंबर जोशी यांनी आपल्या पुस्तकात उत्तम भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी गुरु आणि शिष्य यांचे पूर्वीचे नाते आणि आता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असलेले नाते कसे बदलत गेले यावर प्रकाश टाकला.



यावेळी बोलताना रामचंद्र देखणे म्हणाले की काव्याची फार मोठी परंपरा भारताला मिळालेली आहे. वैदिक काळापासून रचलेली ही महाकाव्य म्हणजे भारताने जगाला दिलेली देणगी आहे. हे वैश्विक साहित्य सृष्टीचे वैभवच आहे. ह्या काव्यांवर बरेच वर्ष कोणी लिखाण केले नव्हते. आज या पुस्तकाच्या माध्यमातून त्यावर भाष्य करण्यात आले आहे. एका विषयावर शंभर शंभर श्लोक लिहिणे हे भर्तृहरी त्रिशतक काव्याचे वेगळेपण आहे. भर्तृहरी मधील नीती शृंगार, वैराग्य या तिन्ही शतकांवर दिगंबर जोशी यांनी आपल्या पुस्तकात भाष्य केले आहे.
मराठी साहित्यिकाला इंग्रजी, इटलीमधील कादंबऱ्यांवर भाषांतर करावंसं वाटतं पण संस्कृत मधील एखाद्या महाकाव्याचे भाषांतर मराठीत कराव असं वाटत नाही हे दुर्भाग्य आहे असे म्हणावे लागेल. अशी खंत देखणे यांनी यावेळी व्यक्त केली.
बाबा धुमाळ म्हणाले, वारजे परिसरातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळाव म्हणून चार वर्षापूर्वी आपण जेष्ठ साहित्यिक माधवी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या वारजे साहित्यिक कट्ट्याची स्थापना केली. आजपर्यंत या कट्ट्यावर ७५ मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम झाले आहेत. अनेक दिग्गज साहित्यिकांनी या साहित्य कट्ट्यावरती उपस्थिती लावली आहे. या कट्ट्यावर नवोदित साहित्यिक घडत असल्याने मनाला समाधान वाटत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी.दा. पिंगळे यांनी केले.



