वारजे माळवाडी ते आळंदी खंडित केलेली बस सेवा पुन्हा त्वरीत सुरू करा..

नियमित आळंदीला जाणाऱ्या भाविकांसाठी बाबा धुमाळ यांची पीएमपीएल कडे मागणी
वारजे : काही वर्षापूर्वी वारजे माळवाडी ते आळंदी अशी सुरू करण्यात आलेली बससेवा बंद करण्यात आल्याने नियमित आळंदीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांचे हाल होऊ लागले आहेत, त्यामुळे ही बस सेवा त्वरीत पुन्हा सुरू करावी अशी मागणी माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे या भागात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायातील लोक राहतात. त्यामुळे नियमित व प्रत्येक एकादशीला आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक खूप आहेत. पूर्वी या भाविकांना थेट आळंदीला जायला बस नसल्याने मोठी अडचण येत होती. बस बदलत त्यांना आळंदीला जावे लागत होते. यातील बरेच भाविक जेष्ठ असल्याने याचा त्यांना त्रास होत होता त्यामुळे बाबा धुमाळ व माजी नगरसेविका दिपाली धुमाळ यांनी वारकरी संप्रदायातील भाविकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी पी एम पी एल कडे पाठपुरावा करून वारजे माळवाडी ते आळंदी ही बस सेवा सुरू केली होती. ही बस सेवा सुरू केल्यानंतर आळंदीला नियमित जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय झाली होती.
परंतु सध्या ही वारजे माळवाडी ते आळंदी बससेवा खंडित करण्यात आली असल्याने आळंदीला जाणाऱ्या भाविकांचे, वयोवृद्ध नागरिक व वारकरी मंडळींचे पुन्हा हाल होऊ लागले आहेत, त्याची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे नियमित आळंदीला जाणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही खंडित झालेली वारजे माळवाडी ते आळंदी बस सेवा त्वरीत सुरू करण्यात यावी अशी मागणी बाबा धुमाळ यांनी पीएमपीएल कडे केली आहे.







