महाराष्ट्र

राज ठाकरेंनी कोश्यारींच्या विरोधात खळ्ळ खट्याक करावे : प्रा. मनीषा कायंदे

मुंबई : चोराच्या उलट्या बोंबा… सौ चुहे खाँके बिल्ली चली हज को… आयत्या पिटावर रेघोट्या… तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो… या सगळ्या म्हणी राज ठाकरे यांच्या भाषणाला तंतोतंत लागू पडतात. सतत कोलांटउड्या मारत नवनवीन भूमिका बदलून सुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. आपले अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी ते काहीही बरळत सुटले आहेत, अशा शब्दांत शिवसेना आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Img 20221122 wa0117172785890606677739


प्रा. मनीषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आगडोंब उसळला आहे. भाजपधार्जिणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा अपमान केला आहे. महाराष्ट्राविषय़ी वाईट बोलायचे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले – सावित्रीमाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करायची, अशी मोहिमच भाजपधार्जिण्या कोश्यारी यांनी हाती घेतली आहे. कोश्यारी यांची हकालपट्टी करा, अशी महाराष्ट्रातील जनतेकडून मागणी होत आहे. या मागणीसाठी मोठे आंदोलन सुद्धा उभे राहिले. परंतु राज्यपालांविरोधात आंदोलनाविषयी ब्र शब्द सुद्धा काढण्याची तसदी राज ठाकरे यांनी घेतली नाही. भाजपचे नेते नाराज होणार नाहीत, अशा पद्धतीने हातचे राखून राज ठाकरेंनी भाषण केले. जास्त बोलल्यानंतर ईडी पुन्हा मागे लागेल, अशी राज यांना भाषण करताना सतत भिती वाटत असावी असे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होते.
कोश्यारी यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन पुकारले तर खरोखरच महाराष्ट्र बंद होईल, या कल्पनेनेच राज ठाकरे यांची गाळण उडाली आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाचा इतिहास सांगण्याची केविलवाणी धडपड राज यांनी भाषणातून केली.
टोल, मराठी मुलांचे रोजगार यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनाचे दाखले राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिले. ही आंदोलने विस्मृतीत गेल्याचे खापर त्यांनी लोकांच्या माथी मारले. वास्तवात राज ठाकरे यांच्या मनसेची आंदोलने कशा प्रकारे होतात. समोर आंदोलन करायची, अन् माघारी चर्चा करायची हे जनतेच्या पक्के ध्यानात आहे. लोकांनी मनसेच्या अशा आंदोलनाविषयी आपली स्मृती शाबूत ठेवल्यामुळेच राज ठाकरेंच्या मनसेला सतत पराभव चाखावा लागल्याची आठवण प्रा. कायंदे यांनी करून दिली.

Img 20221126 wa0212847205965836399706


दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीररित्या राज ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या होत्या. माझे नाव वापरायचे नाही, अशी ताकीद बाळासाहेबांनी दिली होती. पण बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपले दुकान चालणार नाही, हे राज ठाकरे यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी भाषणात बाळासाहेबांचे नाव घेण्याचा हावरटपणा केला. राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव साहेबांचे राजकीय मतभेद आहेत. परंतु भाऊ म्हणून उद्धव साहेबांनी राज यांच्या कुटुंबाविरोधात कधीही भूमिका घेतली नाही. राज ठाकरे यांच्या आजारपणात उद्धवसाहेबांनी कधीही चुकीचे वक्तव्य केले नाही. उलट राज ठाकरे यांच्या ते पाठीशी मोठा भाऊ या नात्याने ते उभे राहीले. परंतु कालच्या भाषणात राज यांनी उद्धव साहेबांच्या आजाराची नक्कल करून दाखविली. हे फारच संतापजनक होते, अशी भावनिक नाराजी सुद्धा प्रा. कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

Img 20221012 192956 045 1


महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. पण शिवसेना तसेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. खोकेफेम गद्दारांनी बाळासाहेबांच्या सुपूत्राच्या पाठीत खुपसलेला खंजीर लोकांना पटलेला नाही. त्यामुळे सगळ्या निवडणुकांमध्ये गद्दार व भाजपचा पराभव होणार आहे. या गद्दारांच्या वळचणीला गेलो तर आपल्याही दोन – चार जागा निवडून येतील, असे स्वप्न राज ठाकरे यांना पडले आहे.
सततच्या अपयशाने खचलेल्या राज ठाकरे यांना आता गद्दारांचा आधार वाटू लागला आहे. म्हणून भाजपच्या सांगण्यावरून खोके सरकारसाठी त्यांनी कालची सभा प्रायोजित केली होती, अशा तीक्ष्ण शब्दांत प्रा. कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर आसूड ओढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये