डॉ. प्रेरणा राणे लिखित “शांतीयात्री” पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन व डॉ. ललिता देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्याला आपले जीवन समर्पित केलेल्या डॉ. प्रेरणा राणे लिखित “शांतीयात्री” या पुस्तकाचे प्रकाशन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पार पडले.
शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्यालय श्रमिक भवन एकलव्य सभागृहात पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी व कामगार नेत्या तसेच प्रसिद्ध लेखिका कॉ. मुक्ता मनोहर, दिलीप कुलकर्णी, ललिता देशपांडे, चंद्रकांत गमरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकाच्या लेखिका डॉ. प्रेरणा राणे या स्वतः अभियांत्रिकी पदवी व डॉक्टरेट पदवी संपादन करून व्हिजेटीआय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. तसेच लोक विज्ञान संघटनेच्या स्थापनेमध्ये पंधरा वर्षे सक्रिय राहून त्यांनी कार्य केले. शिवाय आदिवासी मुलांसाठी जीवन शिक्षण शाळा विज्ञानाचा जागर असे उपक्रम राबविले. आय.एस. ए.बी. स. च्या फॅसिलिटेटर हे पद देखील भूषविले. सामान्य नागरिकांसाठी मराठीतून कार्यशाळा घेतल्या तसेच कामगार कार्यकर्ते म्हणून आय.एस. ए. बी. स. सारख्या कार्यशाळेत युनियन कार्यकर्त्याची प्रशिक्षण घेतले.
डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनची सुरुवात करून आर्थिक व सामाजिक स्तरावरील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मार्गदर्शन केले. पुण्यामधील सफाई कामगारांच्या मुला मुलींसाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विद्या चेतना प्रकल्प” च्या माध्यमातून गणित व विज्ञान अतिशय सोप्या भाषेत शिकवण्याचे वर्ग घेतले. त्यामुळे सफाई कामगारांच्या मुले दहावी व बारावीत ८०% ते ८५% गुण घेऊन उत्तीर्ण झाली. अशा या महान समाजसेविका व उच्च विद्याविभूषित लेखिकेचा जन्मदिवस “प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचे दुसरे वर्ष आहे.

या महत्वपूर्ण दिनी डॉ. प्रेरणा राणे यांनी अतिशय मेहनतीने व अभ्यासपूर्वक लिहिलेले *”शांती यात्री” हे पुस्तक अतिशय मानवी जीवनाला महत्त्वपूर्ण प्रेरणा देणारे ठरेल. शांती यात्री ही सन १९०८ मध्ये अमेरिकेत जन्म घेतलेली ही स्त्री आहे. त्या कालखंडात जगाच्या पातळीवर अशांतता होती, त्यामुळे जगात शांतता नांदेल या विश्वासाने नेसती वस्त्रे व खिशामध्ये मावतील एवढ्याच मोजक्या वस्तू जवळ बाळगून ती दशकात अखंडपणे पायी चालत राहिली. लोकांनी जे अन्न देईल ते खाऊन आणि जेवण नाही मिळाले तर उपाशीच राहून कोणी निवारा दिला तर ती रात्र गुजरायची, नाही आसरा दिला तर ती पायी चालत राहायची अशा या शांततेचा ध्यास घेतलेल्या एका अद्वितीय अनमोल असे महान कार्य करणाऱ्या एका स्त्रीची ही कहाणी अंतर्भूत करणारी आणि कार्यप्रवृत्त करणारी आहे. सदर पुस्तक प्रकाशन समारंभास युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस कॉ. मधुकर नरसिंगे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



