माझ्या अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींनो…..

मी एक फुटबॉल प्रशिक्षक असल्यामुळे रोज माझ्या खेळाडू विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आणि संवाद असतो. असेच एक दिवस माझ्या एका विद्यार्थ्यांशी बोलत असताना (वय ९ वर्ष) मी त्याला विचारले , तुला तुझ्या आयुष्यात फुटबॉल व्यतिरिक्त काय करायच आहे? तेव्हा त्याच्या भोळ्या भाबड्या मनाने लगेच उत्तर दिले, ” सर ! मला अमेरिकेला जायचं आहे, आणि तिथे राहायचं आहे !”
त्याने दिलेल्या या उत्तराने माझ्या चेहऱ्यावर फक्त एक कडवट हसू आणू शकलो. मी त्याला विचारले ” आसे का बरे वाटते तुला?” यावर त्याने उत्तर दिले ” माझे बाबा म्हणाले तिकडे खूप भरी असते सगळे !”
एवढंच !!!!
आपण भारतीय लोक मनाने काही बाबतीत कुठेतरी फार प्रभावाखाली असतो, भंपक आयुष्याचा किंवा एखाद्या रंगरंजित दुनियेच्या !! त्यामुळे अमेरिकेसारख्या विकसित देशाबद्दल कुतुहल वाटणे साहजिक आहे . परंतु काही पालक अजाणत्या वयातच मुलांच्या डोळ्यासमोर अमेरिकेबद्दल एक वेगळंच चित्र बनवत आहेत.. ज्यामुळे अमेरिकेला जाणे हे त्यांचे ध्येय बनत चालले आहे. यामध्ये कुठेतरी आपल्या देशाबद्दल असलेली आत्मियता , देशभावना , देशाबद्दल चा अभिमान , या गोष्टी फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. आपला स्वतःचा विकास करता करता आपल्या समाजाचा विचार, आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावणे हेही आपले कर्तव्य आहे, ही भावना लहान मुलांच्या मनात जागृत करणे ही काळाची गरज आहे.

लहान मुले सोडाच, पण आज जी पिढी पन्नाशी मध्ये आलेली आहे , त्यांनी त्यांच्या तरुणपणी त्यांच्या कळत्या वयात समाजकारण, आंतरराष्ट्रिय राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टींचा अभ्यास केला असता त्यांना या गोष्टी लक्षात यायला हव्यात की, १९६० ते २००० पर्यंत जवळ जवळ ४० वर्षे अमेरिका या देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची गळचेपी केलेली आहे, भारताचा छळ केला आहे. तो इतका भयानक आहे की सांगता येणार नाही.



पाकिस्तान आणि चिन हे भारताचे खुल्या मैदानातले शत्रू आहेत, त्यांनी दिलेला त्रास भारताला अपेक्षितच आहे. परंतु भारताच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत भारत उभारी घेऊ नये आणि त्यांच्या विकास होऊ नये यासाठी अमेरिकेने जी काळजी घेतली आहे, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. या सत्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला होणे आता गरजेचे आहे.



खूप खोलात बोलत नाही पण
अमेरिकेनं आपल्याला दिलेला त्रास हा चीन आणि पाकिस्तान ने दिलेल्या त्रासाच्या तोडीस तोड किंबहुना त्यापेक्षा ही जास्त आहे. त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर हानी झालीच पण देशपातळीवर देखील त्याचे खोलवर रुजलेले परिणाम इतके भयावह होते की १९७० ते १९८० चा दशकात अंगात सळसळतं रक्त आणि देशासाठी कार्य करायची इच्छा असून सुद्धा केवळ बोटावर मोजण्याइतकेच लोक कार्य करू शकले आणि एक प्रभावशाली पिढी लुप्त झाली. अमेरिकेने भारतासाठी ज्या अनेक त्रासदायक गोष्टी केल्या त्या आपण विसरून जात आहोत, पण त्याच जर आपण भारतीयांनी त्यांच्यावर केल्या असत्या तर ते कमीत कमी २०० वर्षे विसरले नसते आणि आपल्या देशाला सर्वतोपरी सर्वसक्षम बनवलं असतं . आणि आपण भारतीय कळत नकळत आपल्या तरुणांना , आपल्या लहान मुलांना अमेरिकेचे गोडवे गाऊन दाखवतो आणि यामुळे त्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल ची आत्मियता , आपलेपणा, थोर लोकांनी केलेला त्याग याची जाणीव कमी होत आहे.
असो….



तंत्रज्ञान , वैद्यकीय व इतर तत्सम गोष्टींसाठी आपण बऱ्याच बाबतीत बाकी देशांवर अवलंबून आहोत आणि काळाची ती गरज आहे. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण यासाठी अमेरिकेत शिकले तर काहीच चुकीचे नाही, ज्ञान साधनेसाठी या शिक्षणाचा वापर झाला तर यात वावगे काहीच नाही. पण अमेरिका हे साध्य नसून साधन आहे हे कळणे फार गरजेचे आहे. अंतर्मनात थोडीशी तरी देशभवना जिवंत ठेवून, चांगल्या कृतीतून आणि विचारातून प्रत्येकाने आपापल्या परीनं एकतरी पाऊल आपल्या क्षेत्रात पुढे टाकने गरजेचं आहे. कुठेतरी भंपक आणि दिखाव्याच्या कल्पनेपेक्षा , भारतीय असल्याची भावना व अस्मिता गरजेची आहे. अमेरिके पलीकडे असलेले सुंदर विश्व उघड्या डोळ्यांनी तरुणांना आणि लहान मुलांना दाखवणं आणि समजावणं गरजेचे आहे. माझ्या देशाला माझी गरज आहे ही भावना जिवंत ठेवणं गरजेचं आहे..
पराग रावडे
फुटबॉल प्रशिक्षक


















