पुण्यात पाणीकपात नको -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा पाणीकपात करू नये आणि पुण्याला हक्काचे १८.५ टीएमसी पाणी मिळावे अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कालवा समितीच्या बैठकीत बोलताना केली.
खडकवासला धरणातील हंगामी पाणीवाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी कालवा समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. त्या बैठकीत शिरोळे यांनी पुणेकरांच्या हक्काचे १८.५ टीएमसी पाणी मिळायलाच हवे ही मागणी जोरदारपणे केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणसाखळीत शंभर टक्के पाणीसाठा झाला शिवाय लॉकडाऊनच्या काळात पुण्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते. मंगल कार्ये तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते, बांधकामेही थांबली होते त्यामुळे पाणीवापरही कमी झाला होते. त्यामुळे यंदा पाणी कपातीची गरज पडणार नाही आणि ती करूही नये असे शिरोळे यांनी सांगितले.

भामा आसखेड धरणाचे १.५ टी एम सी पाणी शहराला वाढणार आहे, तरी पण महापालिकेची हद्द नुकतीच वाढलेली आहे, आणि ३४ गावांचा समावेश पुणे म न पा च्या हद्दीत होणार आहे. हद्दीलगच्या पाच किलोमीटरपर्यंतच्या भागात महापालिकेलाच पाणीपुरवठा करावा लागणार आहे हे लक्षात घेऊन पाणीवाटपाचे नियोजन करावे असे शिरोळे यांनी सांगितले आहे.






