पुणे शहर

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या १९ व्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला कोथरुडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चौथ्या टप्प्याला प्रारंभ

नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासन आणि जनतेचा थेट संवाद

पुणे : नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’च्या १९व्या पर्वाला कोथरुड विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच अभियानाच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याची सुरुवात कोथरुडमधून करण्यात आली. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या विविध नागरी, प्रशासकीय तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या मांडल्या. नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी अभियानाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर थेट मांडता आल्या. अनेक प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली, तर प्रलंबित विषयांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Img 20260222 wa00064513382578852640289

याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “निवडणूक संपल्यानंतर जनतेशी असलेला संपर्क संपत नाही, तर खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची जबाबदारी सुरू होते. नागरिकांना आपल्या समस्या घेऊन वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’च्या माध्यमातून प्रशासनाला नागरिकांच्या दारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखादी समस्या ऐकून घेणे ही केवळ सुरुवात आहे; त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्याचे समाधान होईपर्यंत सोबत राहणे, ही आमची भूमिका आहे.”

“पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये अभियानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, नागरिकांचा मिळणारा सातत्यपूर्ण प्रतिसाद आणि वाढता विश्वास ही या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे. आज कोथरुडमधून चौथ्या टप्प्याला सुरुवात करताना पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, सेवा आणि विकासकामांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान यापुढेही सातत्याने सुरू राहील,” असे मोहोळ यांनी सांगितले.

‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ हे केवळ तक्रारी स्वीकारण्याचे व्यासपीठ न राहता नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित झाले आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि संबंधित विभागाशी संपर्क साधण्यासाठी मदत उपलब्ध करून देण्यात येते.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये अभियानाचे आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. प्रत्येक टप्प्यात नागरिकांचा वाढता सहभाग पाहायला मिळाला असून, नागरिकांनी आपल्या प्रश्नांसाठी या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्याची सुरुवात कोथरुड विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली असून, आगामी काळात इतर विधानसभा मतदारसंघांमध्येही हे अभियान राबविण्यात येणार आहे.

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, प्रशासनाशी थेट समन्वय आणि प्रश्न सुटेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा या त्रिसूत्रीवर हे अभियान पुढे नेण्यात येत आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय यंत्रणेचा अधिक प्रभावी वापर करण्यावर अभियानात विशेष भर देण्यात येत आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये