पुणे शहर

राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना..

मंत्री चंद्रकांत पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली राखी


पुणे : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाउंडेशनच्या भगिनींसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी अनेक मातांनी दादांच्या मनगटावर राखी बांधत आपल्या आयुष्यातील एका अनमोल क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे कोथरूड परिसरातील वस्ती भागातील असंख्य महिलांचे बाळंतपण अतिशय सुरक्षितपणे केले जाते. आर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीच्या काळात निर्माण होणारी चिंता, उपचारांचा खर्च आणि सुरक्षित बाळंतपणाची काळजी यामुळे अनेक कुटुंबांसमोर मोठे आव्हान उभे राहते. मात्र, दादांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू मातांना आधार मिळाला आणि त्यांची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली.

Img 20260222 wa00064513382578852640289



या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या मातांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने चंद्रकांतदादा पाटील यांना राखी बांधली, तेव्हा वातावरण भावूक झाले. ज्या हातांनी त्यांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी आधार दिला, त्याच हातावर या मातांनी प्रेम आणि कृतज्ञतेचा धागा बांधला. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यांतील कृतज्ञतेची भावना हीच या उपक्रमाच्या यशाची खरी पावती ठरली.

“दादा, आमच्या बाळाला सुरक्षितपणे या जगात आणण्यासाठी तुम्ही दिलेला आधार आम्ही कधीच विसरणार नाही,” या भावनेतून मातांनी राखी बांधताना व्यक्त केलेली कृतज्ञता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

Img 20260828 wa02188296505548108983555



पाटील म्हणाले, “आज आपल्या बहिणी सक्षम आणि समर्थ झाल्या आहेत. मात्र रक्षाबंधनाचा सण आणि त्यामागची भावना कायमस्वरूपी जपली जाईल. ‘सखी-सुखदा’च्या माध्यमातून सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करण्यासोबतच गरोदर महिलांसाठी आपल्या संस्कृतीतील संस्कार जपता आले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे!” या विचारातून दातृत्वाची प्रेरणा घेऊन आपणही इतरांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक मातेने आपले आणि बाळाचे आरोग्य जपावे, असे आवाहन ही त्यांनी यानिमित्ताने केले.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने नामदार चंद्रकांत पाटील यांनी सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून बालवाडी सुरु करण्याची ओवाळणी सर्व मातांना दिली. तसेच, फाऊंडेशनच्या माध्यमातून १६ महिन्यांच्या बाळाची श्रवणक्षमता शक्य तितकी उत्तम होण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करण्याचाही घोषणा ही त्यांनी या कार्यक्रमात केली.

या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका स्मीता पाटील, ॲड. तनिषा पाटील, सुरेखा जगताप, आकांक्षा कर्णावत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह कोथरुड मधील वस्ती भागातील असंख्य माता उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये