वारजे, शिवणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करणे हेच आमचे प्रथम ध्येय ; वारजेच्या भविष्यासाठी नागरिकांनी योग्य विचार करावा : मनसे उमेदवार भाग्यश्री दांगट

वारजे : आजची वारजेची परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं. रोज होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वारजेकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. मात्र एवढ्या वर्षात त्यावर तोडगा काढता आला नाही हे अपयश कोणाचं याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. असे आवाहन प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर मधील मनसेच्या उमेदवार भाग्यश्री कैलास दांगट यांनी केले आहे.
मनसेच्या उमेदवार भाग्यश्री दांगट शिवणे गावठाण, दांगट पाटीलनगर, एनडीए रोड परिसरात वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी मतदार त्यांना जाणवत असलेल्या समस्या भाग्यश्री दांगट यांच्या समोर मांडत आहेत.
वारजे हायवे चौक ते गणपती माथा पुढे शिवणे उत्तमनगर पर्यंत एनडीए रस्त्यावर रोज होत असलेली वाहतूक कोंडी नागरिकांसाठी मनस्ताप ठरत आहे. २ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा पाऊण तास घालवावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामावर जाण्यासाठी नागरिकांना एक ते दीड तास आधीच घरातून निघावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्या वेळेचाही अपव्यय होत आहे.
खरं तर वारजे माळवाडी परिसराला महापालिकेत जाऊन एवढे वर्ष झाली. पण खरंच आपला भाग महापालिकेत आहे का असा प्रश्न येथील समस्यांकडे बघून येतो. केवळ रिल, व्हिडिओ, पाहणी, बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही तर आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. असे म्हणत त्यांनी वारजे शिवणेकरांना भविष्यासाठी योग्य विचार करण्याचे आवाहन केले आहे, तसेच या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करणे हेच आमचे प्रथम ध्येय असल्याचे भाग्यश्री दांगट यांनी म्हंटले आहे. यावेळी प्रचार दौऱ्यात नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




