मनाला भावणारी गीते आणि त्याला मिळालेली काव्य संगत यामुळे कर्वेनगरवासियांची दिवाळी पहाट ठरली संस्मरणीय..

कर्वेनगर : कर्वेनगरवासियांची दिवाळी दोन दिवस झालेल्या स्वर दिपोत्सव कार्यक्रमाने संस्मरणीय ठरली. ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात मनाला भावणारी गीते आणि त्याला मिळालेली काव्य संगत यामुळे रंगतदार ठरली. कर्वेनगर मधील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या वतीने दोन दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन पहाट आणि दिवाळी पाडवा पहाट या दोन दिवशी आयोजित केलेल्या स्वर दिपोत्सव कार्यक्रमात पहिल्या दिवशी शब्द सूर लेणे आणि दुसऱ्या दिवशी गीतांची सुरेल पहाट असे मनाला भावणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.



कर्वेनगर मधील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. प्रसिद्ध कवी वैभव जोशी, प्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आणि गायिका योगिता गोडबोले याचसह निवेदक स्नेहल दामले आणि वादक वृंद यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून उपस्थित श्रोते वर्गाच्या मनाचा ठाव घेतला.



गायिका योगिता गोडबोले यांनी प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती,
पानोपानी अमृत शिंपित, उषा हासरी हसते धुंदित
जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती..
या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि दिवाळी पहाट ची सुरुवात भक्तिसुरात न्हाऊन निघाली त्यानंतर जितेंद्र अभ्यंकर यांनी फिरत्या चाकावर देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, देव देव्हाऱ्यात नाही, विठू माऊली तू माऊली जगाची माउलीच मूर्ती विठ्ठलाची..अशा रचना सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. जितेंद्र अभ्यंकर आणि योगिता गोडबोले या दोघांनी गायलेले फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश..हे गीत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.



हा कार्यक्रम गाण्यापुरता मर्यादित न राहता त्याला कवी वैभव जोशी यांच्या कवितांची मिळालेली साथ यामुळे सूर आणि शब्दांची एक वेगळी मैफिल रसिकांना अनुभवता आली. गीत सुरांबरोबरच कवितेच्या काव्यात्मकतेवर ही मराठी माणसाच तितकच प्रेम आहे हे यातून दिसून आले.
यावेळी वैभव जोशी यांनी भक्ती गीतांचा आधार घेत सादर केलेली देव असेल तर कसा असेल यावरील कविता मनाचा ठाव घेणारी ठरली
“बहुदा एखाद्या मेहंदी काढणाऱ्या मुलीसारखा बसत असावा देव, जमणाऱ्या प्रत्येक हातावर मेहंदी रेखत प्राक्तनाची, दोनच रेषा महत्वाच्या एक पैशाची आणि दुसरी आयुष्याची, आजुबाजूला दोनचार ठिपके आवर्जून सुखाचे, हात अगदीच रिकामा रिकामा वाटू नये म्हणून.. या व



किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी, सुरकुत्यामुळे पडलेली भर तुम्हाला काय सांगू मी, झुंज मुंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी..खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला सांगू मी, दिशादिशानी वात्सल्याने हात फिरू लागता तिचा बालक होते उभे चराचर काय तुम्हाला सांगू मी..किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी, या कवितांनी रसिकांची मने जिंकली तर
फिटे अंधाराचे जाळे या कवितेचा आधार घेत कवी वैभव जोशी म्हणतात कृतज्ञता या जगातून कमी होत चालली की काय अशी भीती वाटत असताना या वळणावरून आयुष्याकडे बघणं देखील गरजेचे आहे.. म्हणून ही कविता उतरली असावी..
उगाचच कारे आभाळाला रोज मागशी कोता न्याय..उजाडलेला दिवस पाहिला यावरून मोठे सुख ते काय ? कुठे बिघडते एखादे दान चुकीचे पडले तर, फांदी का शोकाकुल होते तिचे पान झडले तर.. एका पानापायी वेडी अस्तित्वावर रुसते का, नव्या ऋतूचे स्वागत सोडून जुनं आठवत बसते का.. या कवितेने जीवनाचे महत्त्व सांगितले.



यावेळी बासरी वादक अमर ओक यांनी सारे गम प ची धून बासरी वादनातून सादर करत कार्यक्रमात मधुर सूर भरले. गायक जितेंद्र अभ्यंकर, गायिका योगिता गोडबोले यांनी सादर केलेली गीते आणि त्या गीतांचा आधार घेत प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी सादर केलेल्या अर्थपूर्ण आणि जीवनातील वास्तवाला हात घालणाऱ्या कविता आणि बासरी वादक अमर ओक यांची बासरी वादनातून मिळालेली साथ त्यामुळे हा कार्यक्रम शेवटपर्यंत रंगतदार ठरला ..
पाडवा पहाट कार्यक्रमातही गायक ऋषिकेश रानडे, चैतन्य कुलकर्णी, गायिका सन्मिता धापटे शिंदे, मीनल फडके पोंक्षे यांनी सादर केलेल्या गीतांनीही कर्वेनगर मधील रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ‘काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ’ , ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ अशा अभंगानी व मम पाऊली तव चाहुली, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, अधीर मन झाले, मधुर घन आले. राधा ही बावरी हरीची.., कधी तू रिमझिम झरणारी बरसात, नभ उतरू आलं, नदीच्या पल्याड आईचा डोंगुर, अशा गीतांनी कार्यक्रम बहारदार ठरला.






















































