बावधनमधील गायरान जमिनी गावच्या विकासासाठी परत मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल : मंत्रालयात झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे निर्देश

गायरान जमिन गावाला परत मिळवून देण्याचा लढा यशस्वी करणार : किरण दगडे पाटील
बावधन : बावधन येथील विविध संस्थान देण्यात आलेली गायरान जमीन वापरात नसल्याने गावच्या विकासासाठी ती परत मिळावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधन मधील नागरिकांकडून करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. आज मंत्रालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत गायरान जमीन गावाला परत मिळवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत १. आतापर्यंत वाटप केलेल्या जागांचा उपयोग न झाल्यास १ महिन्याची नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले. २. तसेच शिल्लक जमिनीचा गावच्या विकासासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या बैठकीला माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या समवेत ॲड. सूरज चकोर आणि ॲड. अमित आव्हाड उपस्थित होते.
किरण दगडे पाटील म्हणाले, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे काही दिवसापूर्वी माझ्या बावधन मधील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती त्यावेळी गावकऱ्यांनी आणि मी गावची गायरानाची जागा गावच्या विकासासाठी परत मिळावी अशी मागणी त्यांच्याकडे केली होती आणि त्यांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. आजच्या बैठकीत झालेले निर्णय म्हणजे गावची हक्काची गायरन जमीन गावाला परत मिळवून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. गावाला ही जमीन मिळाली तर त्यावर विकासाचे प्रकल्प राबवणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही जमीन मिळवण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असून हा लढा यशस्वी करणार आहे. आजच्या बैठकीत मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करून जे काही निर्देश दिले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.







