‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यांबद्दलची भूमिका मांडली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला असं वाटतं की तुमच्या(प्रसारमाध्यम) माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्यांनी पाहिलं असेल, की ज्यामध्ये. शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या आणि मग त्या शाळा सुरू करताना, ते शासकीय अनुदानावर अवलंबुन राहिले नाहीत, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी, देणग्या म्हणूयात. पण आपण साधरणपणे असं म्हणतो की, दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली.”
याचबरोबर “माझी व्हिडीओ क्लिप जर पूर्ण ऐकली तर मी त्यामध्ये पैठणला आणखीही खूप मांडलं आहे. त्यांची तर प्रचंड वाहवाह सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे. तिथे मोठ्या संख्यंने वारकरी संप्रदाय उपस्थित होता. त्यामध्ये मी असं मांडलंय, की जर आपल्याला संत विद्यापीठ सुरू करायचं असेल, तर सरकारही मदत करेल. पण सरकाच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता?, समाजात खूप लोक देणारे आहेत. त्यावेळी मी हे वाक्य जोडलं की शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या. त्यांना सरकार अनुदान देतय म्हणून त्यांनी सुरु नाही केल्या, वेळप्रसंगी त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्यावेळी दहा रुपये सुद्धा लोक द्यायचे, त्यातून त्यांनी संस्था चालवल्या.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
याशिवाय, “आता या प्रत्येक गोष्टीला असा शेंडा नाही बुडका नाही, वाद निर्माण करण्यासाठी सुरू आहे. जे कोणी ही क्लिप पाहतात, ऐकतात ते लगेचच म्हणतात की अरे या (टीका करणाऱ्यांचं) लोकांचं काय चाललंय?” असं शेवटी चंद्रकांत पाटील म्हणाले.




