हॉटेल आणि रेस्टॉरंट्स साठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नवी मोहीम- तुकाराम मुंढे

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू करण्यात आली त्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.
त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांना सोडणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार या हॉटेल्सचे किचन असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आरोग्य विषयी नियमांचं पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करणं बंधनकारक असावं. जर नियमांचं पालन केलं तर घाबरण्याचं कारण नाही. नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावं, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
किचन कसं असावं?
भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात.
त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात.
त्यातून पाणी झिरपू नये.
हे करताना पुरेशी हवा खेळती हवी.
किचनला एक्झॉस्ट असावा.
कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावा.
स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन
कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावेत.
इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.
पेस्ट कंट्रोल नियमित करावं.
अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा.
ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.
अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवलं जातं. तसं न करता ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. तसा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. जर एखाद्या ग्राहकाला बाटलीबंद पाणी हवं असेल, त्याने मागणी केली तरच त्याला ते देण्यात यावं असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.



