मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा, भाजप जनतेत फूट पाडतोय : मनमोहन सिंग

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. हा राष्ट्रवाद ‘फोडा आणि राज्य करा’ च्या धोरणावर चालतो, असा गंभीर आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जात, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर भाजप सरकार जनतेत फूट पाडत आहे. त्यांना आपापसात लढवले जात आहे, असा गंभीर आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. मनमोहन सिंग यांनी व्हिडिओ जारी करत केंद्रातील मोदी सरकारवरच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी चीनच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर ठाण मांडून बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही अपयशी ठरले आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. देशाची स्थिती चिंताजनक आहे. करोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाहीए. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत, असे माजी पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान पदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे मत आहे. इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून काम करताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी लगावला. चिनी सैन्य एक वर्षापासून आपल्या पवित्र धरतीवर ठाण मांडून आहे. पण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे जुने मित्र तुटले आहेत. शेजारी देशांशीही आपले संबंध बिघडत आहेत. बळजबरीने गळा भेट घेणे, फिरणे किंवा निमंत्रण न देता बिर्याणी खाणे याने देशाचे संबंध सुधारू शकत नाहीत, हे सत्तेत असलेल्यांना हे समजले असेल, अशी आशा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारकडे कुठलीही आर्थिक समज नाही. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलांना याचा त्रास होत आहे. देशातील अन्नदातेच धान्यासाठी धडपडत आहेत. देशात सामाजिक विषमता वाढली आहे. लोकांवरील कर्ज वाढत असून उत्पन्न कमी होत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. सरकार आकडेवारीशी फसवणूक करून सर्वकाही बरोबर सांगत आहे. सरकारच्या धोरणात आणि हेतूंमध्ये दोष आहे, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.






