सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही : आमदार भरत गोगावले

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली आहे, असं म्हटलं आहे.
भरत गोगावले म्हणाले, “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाहत होते. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ.”
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “न्यायालयाच्या विलंबाबाबत किती मोठा आत्मविश्वास भरत गोगावले आणि इतर आमदारांना आहे हे यातून स्पष्ट होत आहे. न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली आहे. आता न्यायालयानेच जनतेचा विश्वास टिकवायचा की नाही हे ठरवायचं आहे.”
शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत की, “सुप्रीम कोर्ट किंवा कोणत्याही कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने, आमदाराने त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्या असतानाही अनावधनाने त्यांनी वक्तव्य केलं आहे. ही आमची भूमिका नाही, वेळ काढण्याचा आमचा हेतू नाही. न्यायालयाचं कामकाज हे त्यांच्या नियमानुसार होत असून, हा त्यांचा सर्वाधिकार आहे. यापुढे असं वक्तव्य केलं जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.”



