मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला : उद्धव ठाकरे

मुंबई : “सर्वोच्च न्यायालयाने निकालात असं निरिक्षण नोंदवलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ आत्ताचं अस्तित्वात असलेलं शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे. मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला. याचं कारण मी सांगितलं आहे.” अशा शब्दांत शिवसेना( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, असं निरिक्षण नोंदवलं यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वासघातक्यांचं प्रमाणपत्र घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यात काडीचाही रस नव्हता
“ज्या लोकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी सर्वकाही भरभरून दिलं, आपलं मानलं, विश्वास दाखवला त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला कदापि चाललं नसतं. अशा विश्वासघातक्यांचं प्रमाणपत्र घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यात काडीचाही रस नव्हता. म्हणून आणि म्हणूनच मी राजीनामा दिला. त्यावर मी समाधानी आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.




