‘ हरी ‘ ला का कोंडून ठेवता ?
मनसेचा सरकारला सवाल

मुंबई : राज्य सरकारने हॉटेल, बार, थिएटर उघडण्यास परवानग्या दिल्या पण मंदिरे उघडायला परवानगी अजून दिलेली नाही. या बद्दल नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच मुद्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
तोंडाने पुनःश्च हरी ओम् म्हणता आणि ‘हरि ‘ लाच कोंडून ठेवता, असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी केला आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडा अशी मागणी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीनेही केली आहे. ठाकरे सरकारने मात्र याला दाद दिलेली नाही. दिवाळीपूर्वी तरी मंदिरे उघडली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणत्याच हालचाली सुरू असल्याच्या दिसत नाहीत.

फक्त मंदिरे बंद ठेवून सरकार विरोधकांवर कुरघोडीचे राजकारण करतं आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात व नागरिकांमध्ये सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. नियमावली करून एक एक गोष्टी सुरू होत असताना मंदिर उघडण्याबाबत का विलंब केला जात आहे. असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. नियमावली करून मंदिरेही उघडली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






