वारजे हायवे परिसर, महात्मा सोसायटी परिसरात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित

एल अँड टी कंपनी आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा दिपाली धुमाळ यांचा आरोप
पुणे : गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर शहरातील पश्चिम भागातील पाणी पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेकडून बंद ठेवण्यात आला होता, पण त्यानंतर आज शनिवार दोन दिवस झाले तरी वारजे हायवे, महात्मा सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. समान पाणी पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेली एल अँड टी कंपनी आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
एल अँड टी कंपनीने कोथरुड मधील गांधी भवन येथील पाण्याच्या टाकीवर फ्लो मीटर बसवल्याने वारजे हायवे परिसर, महात्मा सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे सांगितले जात असून पाणी टंचाईमुळे नागरिक हवलदील झाले आहेत.
आधीच एल अँड टी कंपनीने केलेली कामे अर्धवट असताना ज्या ठिकाणी मीटर बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पाणी वापराबाबत नोटिसा काढून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच दोन दिवसांपासून सुरळीत पाणी येत नसल्याने नागरिकांच्या मनात महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.
माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी याबाबत वारंवार आवाज उठवला असून या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या नोटिसा पाठवणे बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

वारजे हायवे परिसरातील पाणी प्रश्ना संदर्भात दिपाली धुमाळ या सोमवारी महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी, एल अँड टी कंपनीचे अधिकारी, स्थानिक पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासह गांधी भवन टाकीवर पाहाणी करणार आहेत. महापालिका प्रशासन व एल अँड टी कंपनीने समन्वय साधून पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे पण तसे होत नसल्याने नागरिक भरडले जात असून ते सहन केले जाणार नाही त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.












