सुषमा अंधारेंची लेकीला अनुसरून लिहिलेली पोस्ट चर्चेत

पुणे : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैद्यनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर सुषमा अंधारेंनी आपल्या लेकीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये म्हटलंय की,
प्रिय कब्बु, तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता.पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले.
बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात.बाबासाहेब लिहितात, ” जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा ” _ डॉ बाबासाहेब आंबेडकर

शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्याच सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पुढील वाटचालीसाठी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या विभक्त झालेल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. कोण कोणत्या गटात जात याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असे म्हटले आहे.









