रत्नागिरीत पत्रकाराचा खून; महाराष्ट्राचा बिहार केला, जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

मुंबई : नाणार रिफायनरीच्या समर्थकांच्या विरोधात बातमी दिल्यामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा खून करण्यात आला. भाजपच्या एका कार्यकर्त्याने शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडले, ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या, हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो. त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत आहे.”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टिका केली.




