मुरलीधर मोहोळ यांचा एक वर्षांच्या कामाचा अहवाल म्हणजे फक्त ट्रेलर आहे.पिक्चर अजून बाकी – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन
पुणे : मुरलीधर मोहोळ यांचा एक वर्षांच्या कामाचा अहवाल म्हणजे फक्त ट्रेलर आहे.पिक्चर अजून बाकी आहे. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर ते पाच वर्षांचा कामाचा अहवाल सादर करतील त्यावेळी निश्चितच मोठे काम उभे राहिलेले दिसेल.भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेगळ्या संधी देत असतो. कार्यकर्ता याची क्षमता पाहून त्याला वेगवेगळी संधी दिली जाते. भाजप पक्ष हा पुढील पिढी देखील दूरदृष्टीने तयार करत असतो. खासदार मुरलीधर मोहोळ हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे ” प्रथम माणूस”पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपरा प्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी नियोजनबद्ध काम केले त्यामुळे देशात त्यांचे नाव झाले. सदर काळात विविध क्षेत्रासाठी आणि लोकांकरिता त्यांनी अतुलनीय काम केले. संयम न सोडता आणि पाठपुरावा करून त्यांनी आपले काम आतापर्यंत केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्यंतरी एक बातमी पाहिली की, देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून ते नऊ वेळा पुण्यात आले, पण असे मी काही मोजत नाही. मुरलीधर मोहोळ त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन आणि वर्षपूर्ती कार्याचे अहवाल प्रकाशन करत आहे ही महत्वाची गोष्ट आहे. देशात कोणत्याही खासदाराचे अशाप्रकारे नागरिकांसाठी २४/७ कार्यालय पाहिले आहे. स्व. गिरीश बापट यांनी चांगले नेतृत्व पुण्याचे केले. त्यांच्या नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने खासदार पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव ठरवले. मोहोळ निवडून आल्यावर त्यांना देशातील महत्त्वाचे खाते काम करण्यासाठी मिळाले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत ते काम करत आहे. त्यांची शिस्त कडक आहे. तेथील पद हे जबाबदारीचे असून ते उपभोगता येत नाही. अमित शाह यांनी मला खासगी गप्पात सांगितले की, मुरलीधर मोहोळ चांगला नेता असून अभ्यासू असल्याने त्यांचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देशभरात मुरलीधर मोहोळ फिरून विविध दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करत आहे. सातत्याने विविध ठिकाणी फिरून दांडगा जनसंपर्क देखील ते करत आहे. तसेच पुण्याचे केंद्राकडे असलेले विषय सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे जागृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना खूप काही अनुभव येतात. केंद्रीय मंत्री गाड्या-घोड्या दिसताना ते सर्व फार छान दिसत असले तरी केंद्रामधील हेडमास्तर हे फार कडक असून त्यांचा सामना करावा लागतो. येथील हेडमास्तर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मवाळ आणि सौम्य होते. थोडी काही चूक झाली आणि ती दुरुस्ती केल्यानंतर सर्व काही ठीक व्हायचे, मात्र केंद्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे.



मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा-सात दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यमंत्र्यांना अनौपचारिकपणे गप्पा मारण्यासाठी आणि चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावर एक छत कोसळला होता. सायंकाळी झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधान प्रत्येकाच्या खात्याबाबत माहिती घेऊन अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी मी त्यांना माझे खाते आणि माझा परिचय दिला. त्यावेळी त्यांनी लगेचच विचारलं की आज दिवसभर काय केले.
कदाचित त्यांना दिल्ली विमानतळावर झालेल्या अपघाताबाबत मला माहिती आहे का ? नाही हे जाणून घ्यायचे असेल मात्र मी त्या दिवशी त्या अपघात ठिकाणी देखील गेलो होतो आणि त्यापूर्वी जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी देखील केली होती. त्याबाबत मी पंतप्रधानांना कल्पना दिली. माझे सर्व काही ऐकून घेतल्यानंतर मोदीजींनी मला सांगितलं की तुम्हाला माहित आहे का? तुम्ही घटनास्थळावर अडीच तास उशिरा पोहचला होतात. अशा पद्धतीने पहिल्याच भेटीत आपला समाचार झाल्याने कुठून येथे आलो, अशी भावना आपल्या मनात आल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
विश्वविद्यालयाचे एक बिल लोकसभेत अमित शहा यांनी मांडले. त्यानंतर अमित शहा यांनी मला बोलून घेतले आणि सांगितले राज्यसभेत तुला बिल मांडायचे आहे. तेव्हा माझ्या पोटातच गोळा आला. मनातल्या मनात म्हणालो, माझा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्याआधीच संपायचा. मला काही सुधरेना. पुन्हा अमित शहा म्हणाले, मी सुद्धा राज्यसभेत असणार आहे. मी अमित शहा यांना म्हणालो तुम्ही राज्यसभेत असाल तर अजून टेन्शन येईल. अमित शहा म्हणाले टेन्शन कशाला घेतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलायचे झाल्यावर काय करणार? जा थोडा अभ्यास कर.. नंतर बाहेर पडताना म्हणाले थोडा हिंदीचा अभ्यास कर. त्यामुळे दिसते तसे नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं म्हणून मी केंद्रात गेलो अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.



