सिंहगड रस्त्यावर उद्या (रविवारी) खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट जाणून घेणार पुणेकरांचे प्रश्न

मुरलीधर मोहोळ यांचा सलग १२ जनता दरबार
पुणे : पुणेकरांचे प्रश्न, समस्या आणि नवकल्पना थेट ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ अर्थात जनता दरबार या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता पर्वती विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आला आहे. हा जनता दरबार रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सिंहगड रस्त्यावरील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार मोहोळ यांनी केले आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात थेट “जनता दरबार” या संकल्पनेवर आधारित संवाद सुरू केला. या माध्यमातून नागरी प्रश्न, प्रलंबित कामे आणि विकासासाठी उपयुक्त कल्पना यांचा थेट आढावा घेऊन त्यावर कार्यवाही केली जाते. पहिल्या टप्प्यात कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या मतदारसंघांमध्ये अभियान यशस्वीपणे पार पडले. आता पर्वती विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम दुसऱ्यांदा राबविण्यात येत आहे.

या अभियानादरम्यान महापालिका, पोलीस व विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता येईल, तक्रारी नोंदवता येतील आणि त्यावर जागेवरच तोडगा निघू शकेल. याशिवाय केंद्र, राज्य सरकार व पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना मिळेल आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ मिळवून देता येतील.
या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘आजवर सलग ११ खासदार जनसंपर्क सेवा अभियानात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील या दुसऱ्या उपक्रमासह पुणे लोकसभा मतदारसंघाचे दोन टप्पे पूर्ण होणार आहेत. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे असली तरी, पुणेकरांचा खासदार म्हणून त्यांचे प्रश्न ऐकणे आणि सोडवणे हे माझे कर्तव्य आहे.
‘जनसंपर्क सेवा अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता पर्वती मतदारसंघातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपले प्रश्न, सूचना आणि कल्पना घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आहे. आतापर्यंतच्या उपक्रमांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद आम्हाला सतत प्रेरणा देत आहे, असेही मोहोळ म्हणाले.