नवीन नियमांमुळे लग्न सोहळे रद्द , तर काहींनी आजच घाईगडबडीत लग्नं उरकली..

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. कोरोना चा प्रसार वाढत असल्याने लग्न सोहळ्यांसाठी आता नवे निर्बंध लागू करण्यात आले असून त्यानुसार लग्न सोहळ्याला आता 50 नव्हे, तर 25 जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली आहे. या नवीन नियमांमुळे आता बऱ्याच जणांनी ठरलेल्या लग्न सोहळ्याच्या तारखा पुढे ढकलल्याचे पाहिला मिळत आहे. तर काहींनी संचारबंदी लागू होणार असल्याने आजच घाईगडबडीत लग्न समारंभ उरकला. Wedding ceremonies canceled due to new rules for wedding ceremonies

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस संचारबंदीची घोषणा केली. अशातच आता जर या संचारबंदीच्या काळात तुम्ही लग्न करणार असाल किंवा तुमचं लग्न नियोजित असेल तर राज्यात आता लग्न समारंभांसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.



केवळ २५ लोकांनाच लग्न सोहळ्याला उपस्थीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु एकाच कुटुंबात २५ पेक्षा जास्त लोक असतात मग दोन्ही कुटुंबांतील २५ लोकात लग्नसोहळा कसा करायचा असा प्रश्न आता लग्नाच्या तारखा काढलेल्या कुटुंबांना पडला आहे तर काही जणांनी लग्न सोहळेच रद्द करून टाकले आहेत. परिस्थिती सुधारल्या नंतर नवीन तारखा काढण्याचा विचार केला जात आहे.



नव्या नियमानुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तसेच लग्न सोहळ्यासाठी केटरिंग किंवा इव्हेंट कंपनीची मदत घेणार असाल तर त्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



