महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना धमकी; राज्यस्तरीय SIT ची स्थापना, गृहमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यावर याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले आहे. राज्यस्तरावर एसआयटीकडूनच या प्रकरणाची चौकशी होईल. असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी यावर चिंता व्यक्त केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्याविषयी भूमिका मांडली. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांकडून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमका हा काय प्रकार आहे? राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते? त्यावर पोलीस दल काय करतंय? या मुद्द्यावरून आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली. “ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

Img 20211129 wa0128

“सभागृहाचे सदस्य प्रभू यांनी विषय उपस्थित केला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी आली आहे. त्या धमकीच्या संदर्भात पोलीस विभागाने तपास केला आहे. धमकी देणाऱ्याचं नाव जयसिंग बजरंगसिंग रजपूत आहे. तो कर्नाटकमधील बेंगलोरचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. तिथे ताबडतोब पोलीस पथक रवाना करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नंतर अतिरिक्त मुख्य न्यायाधिकारी बेंगलोर यांच्यासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Img 20211223 wa00047385789811407218833

आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापना केल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवरून त्याला विरोध करण्यात आला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर आमदारांच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये