“कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?”, पुण्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बॅनर्स चर्चेत!

कसब्यातील भाजपच्या उमेदवारीवर ब्राह्मण समाज नाराज?
पुणे : कसबा आणि पिंपरी या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याविरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या यावर सूचक भाष्य करणारे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.
बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचं सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.
कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत पाटील निवडून आले असले, तरी मेधा कुलकर्णींचं १ लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी २० हजारांवर आल्याचं दिसून आलं. त्यापाठोपाठ आता कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी भाजपाकडून रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावरून ब्राह्मण समाजात खदखद असल्याचे सांगण्यात येत आहे.



