कोरोनामुक्त ग्राम योजना राबविणार- जयंत पाटील

सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गाव केंद्रित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीत राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
या बैठकीत डॉक्टरांच्या समिती स्थापन करून रुग्णांवरील उपचाराचे आॅडीट करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४४४७ रुग्णांच्या बिलांचे अॉडीट करण्यात आले आहे.
पाटील म्हणाले, रुग्णालयाच्या बाहेर दरपत्रकाचे फलक लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय उपचाराचा लाभ घेता यावा यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. संपूर्ण सांगली जिल्ह्यात हेल्पडेस्कच्या माध्यमातून नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीची सध्यस्थिती कळविण्याची व्यवस्था केली आहे.
या बैठकीवेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.



