पुणे महानगरपालिकेचे दोन भाग होणे गरजेचे : चंद्रकांत पाटील

पुणे : शहरातील प्रश्न पाहता आता पुणे महापालिकेचं विभाजन करणं आवश्यक असल्याचं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार.चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पुणे महापालिकेचे आता दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. जर क्षेत्र लहान असेल तिथं काम करणं सोपं, असतं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी गोवा राज्याचा दाखला दिला. दोन महापालिकांबाबत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र पाहता दोन महापालिका होण्याची आवश्यकता असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत ३४ गावं नव्यानं समाविष्ट करण्यात आली आहेत. २३ आणि ११ अशी दोन टप्प्यात ३४ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. राज्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठी महापालिका बनली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हडपसर ही नवी महापालिका व्हावी, अशा चर्चा सुरु होत्या. त्यामुळं आता पुणे महापालिकेचे दोन भाग होऊन हडपसर महापालिकेच्या पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
वाढत्या विस्ताराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन महापालिका करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र कामकाजाच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दोन महापालिका झाल्यास समस्या तातडीने सुटतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.




