बावधन परिसरातील आरएम सी प्लांटच्या प्रदूषणाने त्रस्त नागरिकांच्या आंदोलनाची पर्यावरण मंत्र्यांनी घेतली दखल !

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला आहे नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी लढा
पुणे – बावधन बुद्रुक परिसरातील उत्तमनगर येथे विविध कंपन्यांचे आर एम सी ( रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट कार्यरत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी सोसायट्या असून जवळच नामांकित शैक्षणिक संस्था देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यावर या प्लांटमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम होत आहे.
या प्लांटमधून तयार होणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या प्रक्रियेमुळे हवेत मोठ्या प्रमाणात सिमेंटची पावडर, दगडांचे सूक्ष्म कण आणि धूळ पसरते. त्याचबरोबर या प्लांटशी संबंधित अवचड वाहनांची सततची ये-जा यामुळे परिसरातील धुळीचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता निर्देशांक सातत्याने वाईट ते अत्यंत वाईट अशा पातळीवर नोंदवली जात आहे. परिणामी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे संबंधित आर एम सी प्लांट चालकाकडून पर्यावरणासंदर्भातील शासकीय नियम व निर्देशांचे योग्य पालन होत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे वेळोवेळी निवेदन देऊनही अपेक्षित अशी ठोस कारवाई झालेली नाही. या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की आर एम सी प्लांट राहतील किंवा आम्ही राहू अशी टोकाची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आंदोलन सुरू झाले आहे. रविवारी झालेल्या आंदोलनात संबंधित आर एम सी प्लांटची सखोल चौकशी करून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांटवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण मंत्र्यांकडे करण्यात आली होती.



यावेळी आंदोलनात नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका रूपाली पवार, गणेश वरपे, दीपक दगडे पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या जन आंदोलनाची पर्यावरण मंत्र्याकडून तातडीने दखल घेण्यात आली असून राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) दोन दिवसांत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
किरण दगडे पाटील म्हणाले, बावधनकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना यापुढे मोकळे रान मिळणार नाही, नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा आणखी तीव्र करू, गरज पडली तर मोठे आंदोलन उभे करू आणि या सगळ्यात आपला जनतेसोबत शेवटपर्यंत सहभाग राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.















