पुणे महानगरपालिकेवर कामगार युनियनचा ‘आक्रोश झाडू मोर्चा ‘

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा
पुणे : महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा “आक्रोश झाडू मोर्चा ” महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर आज काढण्यात आला. मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते.
पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यामध्ये सात हजार कंत्राटी कामगार गेली १५ वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून कामे करत आहेत. सदर निदर्शनामध्ये दोन वर्षापासून बंद केलेला बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन फरकासह कामगारांना दिवाळी पूर्वी अदा करण्यात यावा तसेच भविष्य निर्वाहनिधी, ई.एस.आय., दरमहाचे वेतन १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला.

आपघात नुकसान भरपाई, दवाखान्यात मोफत उपचार कंत्राटी कामगाराना मिळाला पाहिजे. महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांनी १७ मे २०२१ रोजी कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा करणे विषयीच्या सुधारित परिपत्रकाप्रमाणे किमान वेतन लागू करावा तसेच ठेकेदार जरी बदलला तरी कंत्राटी कामगारांना कमी करू नये, ओळखपत्र वेतन चिठ्ठी, इ एस आय ची सुविधा त्वरित कंत्राटी कामगारांना मिळाली पाहिजे हे कायद्याने बंधनकारक आहे तसेच कामगार कायद्याप्रमाणे बोनस, घरभाडेभत्ता, व रजावेतन शिवाय टेंडरच्या अति शर्ती नुसार कामाचे साहित्य, गणवेश व इतर सुविधा पुरविणे बंधनकारक असताना ठेकेदार कंत्राटी कामगारांना पुरविल्या जात नाहीत. या विविध मुद्द्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
या सर्व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्याविषयी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अन्यथा आम्हाला रस्त्यावरची व कायदेशीर लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी कंत्राटी कामगारांनी युनियनच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे एकजूटीने व भक्कम ताकदीने लढा उभा करण्याचे आवाहन अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी केले.



कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाच्या व विविध मागण्याच्या संदर्भात युनियनचे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेदरम्यान अतिरिक्त यांनी दोन ते तीन दिवसात युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
या निदर्शनामध्ये युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, ओंकार काळे, शोभा बनसोडे, राम अडागळे, धनंजय आयवळे, रोहीणी जाधव, जयश्री भिसे, करुणा गजधनी, अरुण शेलार, रमेश पारसे, तानाजी रिकीबे ज्येष्ठ सल्लागार प्रकाश ह हुरकडकली यांनी मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले व सभेचा समारोप राजेश पिल्ले यांनी केला.






