संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, योजना़च्या अटी शिथील कराव्यात- आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : श्रावणबाळ, संजय गांधी योजनांच्या अटी शिथील कराव्यात आणि त्या योजनांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, अशा मागण्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मांडल्या.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक अशिक्षित आहेत, तसेच त्यांचा जन्म घरी झालेला असल्याने त्यांच्याकडे जन्माची कोणतीही नोंद नाही. अनेकांनी शालेय शिक्षणच घेतले नसल्याने शाळा सोडल्याचा दाखला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे ही अट शिथिल करून पूर्वीप्रमाणेच शासकीय रुग्णालयाचा वयाचा दाखला किंवा इतर वैध पुरावे ग्राह्य धरण्यात यावेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना या संदर्भात दि.२ मार्च २०२६ रोजी शासनाने जीआर काढला आहे. त्यातील काही अटींमुळे हजारो वृद्ध, निराधार, गरीब लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित रहातील, अशी भीती आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.
दोन्ही योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा केवळ रु. २१,०००/- निश्चित करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या काळात ही मर्यादा अत्यंत जुनी आणि अव्यवहार्य ठरत आहे. यामुळे हजारो गरजू कुटुंब या योजनेतून बाद होत आहेत. ही वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवून ती किमान रु. ५०,०००/- पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली



