वारजेतील संजीवन वन उद्यानातील कामाकडे वन विभागाचे दुर्लक्ष ; दिपाली धुमाळ यांचा आंदोलनाचा इशारा

वारजे : वारजे येथे विकसित होत असलेल्या संजीवन वन उद्यान व टेकडीवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वन विभागालाच येथे लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाबाबत गांभीर्य नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाने तातडीने या बाबतीत उपाययोजना केल्या नाहीत तर जन आंदोलन करण्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी वन विभागाला दिला आहे.
या संदर्भातील निवेदन पुणे वन विभागाच्या उप वन संरक्षक अधिकारी यांचेकडे देताना या प्रकल्पाची तातडीने संयुक्तपणे पाहणी करावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
गेल्या 3 वर्षांपूर्वी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून वन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वन विभागाच्या किमान 35 एकर जागेमध्ये अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून हे संजीवन वन उद्यानाचे काम सुरू करण्यात आले. सध्या या संजीवन वनउद्यान मध्ये नियोजित केलेल्या आराखड्या प्रमाणे काम सुरू असेल तरी त्यात त्रुटी आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची पाहणी केली जावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

धुमाळ यांनी म्हंटले आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लागवड केलेल्या झाडांना पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच संजीवन उद्यानाची हद्द सोडल्यानंतर उदाहरणार्थ उरीट नगर ते पश्चिम रंग या 24 मीटर डी पी रस्त्यालागत असलेल्या वन विभागाच्या जागेमध्ये अस्तित्वात असलेली अनावश्यक असलेली विषारी झाडे आपण वन विभागाच्या मार्फत काढून त्या ठिकाणी आपल्या विभागाच्या सहकार्याने व स्थानिक सोसायटी , शाळांचे विद्यार्थी , बांधकाम व्यावसायिक व सामाजिक संस्था यांच्या मध्यमातून किमान 7000 वृक्षांची लागवड केलेली आहे. या झाडांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु अद्यापही सदर ठिकाणी लागवड केलेल्या वृक्षांना कोणत्याही प्रकारची पाणी देण्याची व्यवस्था केली गेलेली नाही. आपल्या विभागाला वारंवार तक्रार देऊन,पत्र व्यवहार करून तसेच समक्ष भेटून याबाबत महिती देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही.



वन विभाग वन रक्षणासाठी आहे की वननाश करण्यासाठी आहे असा प्रश्न वन विभागाच्या या ठिकाणी सुरू असलेल्या कारभारावरून उपस्थित होऊ लागला आहे. नागरिक वनरक्षणासाठी , वृक्षारोपणासाठी पुढे येत असताना वन विभागाची उदासीनता संताप निर्माण करणारी आहे. असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.



संजीवन उद्यानाच्या विकासाबाबत वन विभागाचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमी नागरिक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या जन आंदोलनास सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील. दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत असताना वृक्ष संवर्धनासाठी वन विभाग सतर्क होणार आहे की नाही हा जनसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. तरी आपणास विनंती की पावसाळा सुरू होण्यापूर्वी या टेकडीची पाहणी करून या सर्व गोष्टींवर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा परिसरातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम्हाला या बाबत टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा धुमाळ यांनी निवेदनात दिला आहे.






