नवरात्राच्या निमित्ताने महिलांच्या निरोगी आयुष्याची मुहूर्तमेढ उभा करूयात. डॉ सचिन नागापूरकर

आज पासून नऊ दिवस भारतभर स्त्री शक्तीचा जागर साजरा होतो. ह्या नऊदिवसात स्त्रीचे खूप कौतुक, गौरव करण्यात येतो. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र व स्त्री शक्तीचा जागर पहिली माळेच्या निमित्ताने आपण महिलांच्या आरोग्यासाठी काय उपाययोजना करणार आहोत, त्यांच्या आरोग्याविषयी आपण किती जागृत आहोत.याचा विचार केला पाहिजे.
आज आपण सगळ्यांनी महिलांना निरोगी आयुष्यमान कसे मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत. शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्त्रियांमध्ये संधिवात, डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीही वाढत आहेत.
भारतात स्त्रियांचे आरोग्य म्हणजे केवळ गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असल्यामुळे शहर व ग्रामीण भागांतील असंख्य महिला कॅन्सरला बळी पडत आहेत. स्तनाचा कॅन्सर झालेल्या दहापैकी पाच महिलांचा मृत्यू होतो, एका वैद्यकीय पाहणीत आढळून आले आहे.
याचा अर्थ, भारतात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. स्त्रियांचे मानसिक आरोग्य, प्रजननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविले आहेत, पण प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होत नाही.
भारतातील महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा कायमस्वरूपी धोका १२ टक्के असतो. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यासाठी शालेय जीवनापासूनच मुलींमध्ये याविषयी योग्य वैद्यकीय माहिती पुरवली गेली पाहिजे. वयोमानानुसार महिलांना हाडे ठिसूळ होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. मासिक पाळी बंद झाल्यानंतर हे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे परिणामी हाडे ठिसूळ झाल्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी चे प्रमाण वाढते.
भारतीय महिलांमध्ये शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण असण्याचा आजार खूप मोठ्या प्रमाणात आहे.
शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण हे बरेच आजार निर्मितीचे कारण ठरते.
प्रमुख कारणे
महिलांमध्ये आजारपणा वाढण्याची कारणे जर लक्षात घेतली तर..
१)सकस जेवनाचा अभाव, त्यामुळे शरीरारा कमी प्रमाणात मिळाणारी प्रथिने, प्रोटीन्स, व्हिट्यामिन्स ,लोह
२) मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्राव.
३) कौटुंबिक जबाबदारी मधून स्वतःच्या शरिराकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसणे.
४) पुरूष प्रधान संस्कृती मुळे…
बर्याच ठिकाणी मिळाणारी दुय्यम वागणूक.
५) होणारी प्रसूती व प्रसूती दरम्यान व नंतर न घेतलेली काळजी.
६) मासिकपाळी बंद झाल्यानंतर शरीरातील होणारे ग्रंथी मधील बदल,होणारी हाडांची झीज.
७) लवकर अथवा उशिरा होणारी लग्न व उशिरा होणारी गर्भधारणा.
८) गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरली जाणारी..वैद्यकीय सल्ला न घेता वापरली जाणारी गर्भधारणा बंदीची औषधे.
वर्षातून एकदा तरी महिलांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. रक्तदाब, शरीरातील रक्ताचे प्रमाण, शरीरातील साखरेचे प्रमाण, पोटाची व ओटीपोटाची सोनोग्राफी, पॅप स्मीयर ही गर्भशयाच्या कर्करोगाची तपासणी, स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करता येण्यासाठी स्तनाची मॅमोग्राफी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी साठी डेक्झा स्कॅन तपासणी अशा तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत
महिलांनी स्वतः स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले, जसे नियमित वैद्यकीय तपासणी व नियमित व्यायाम. योग्य तो आहार.आनंदी जीवन..तर निश्चितच ह्याचा फायदा होईल. खरंच महिलांच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर निश्चितच तिचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते. चला तर मग आज शारदीय नवरात्र स्त्री शक्तीचा जागर ह्या निमित्ताने आपण स्त्रीच्या निरोगी आयुष्याची मुहूर्तमेढ उभा करूयात.













