बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक हैराण; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची पूनम विधाते यांची महापालिकेकडे मागणी

पुणे : बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे या पुणे शहराच्या उपनगरी परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सकाळी लवकर, संध्याकाळी व रात्री या कुत्र्यांचे टोळक्यांमध्ये फिरणे, नागरिकांच्या मागे लागणे, चावणे अशा प्रकारांच्या तक्रारी नियमितपणे प्राप्त होत आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा व वामा वुमन्स क्लब कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या वतीने विशाल विधाते आणि अजिंक्य निकाळजे यांच्या मार्फत एक अधिकृत निवेदन पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीजी दापकेक यांच्याकडे सादर करण्यात आले.

या निवेदनात 1. बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे या परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, त्यांची तातडीने व्यवस्था करण्यात यावी. 2. पुणे शहरातील इतर भागांमध्ये नसबंदी केलेली भटकी कुत्री पकडून बाणेर-बालेवाडी भागामध्ये सोडली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही गोष्ट अन्यायकारक असून, यावर तातडीने कारवाई करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. 3. भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी अधिक सक्रिय पथके, तात्काळ प्रतिसाद सेवा आणि सुसज्ज पुनर्वसन व्यवस्था निर्माण करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
पूनम विशाल विधाते म्हणाल्या, नागरिकांचे आरोग्य, सुरक्षा आणि मानसिक शांती ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.या निवेदनाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेचे प्रशासन, विशेषतः औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, यांना विनंती करण्यात आली आहे की या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष दिले जावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात.निवेदन स्वीकृत करताना सहाय्यक आयुक्त गिरीजी दापकेकर यांनी या बाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.






