पवारांसोबतच्या बैठकीला 22 ब्राह्मण संघटना; या संघटनांनी नाकारले आमंत्रण

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ब्राह्मण संघटनांची बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघ या संघटनांनी पवारांच्या या बैठकीचे आमंत्रण नाकारले आहे.
राज्यातील वाढत्या जातीय तेढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देण्यासंदर्भात भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि विश्वजीत देशपांडे यांनी काही कारणं असल्याचं म्हटलंय.
“शनिवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलवले आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण पवारांना सांगावं. मात्र पवारांना आमच्या नाराजीची पूर्ण कल्पना आहे,” असं दवे यांनी म्हटलंय.
शरद पवारांनी बोलावलेल्या ब्राह्मण संघटनांच्या बैठकीवर परशुराम सेवा संघाचा बहिष्कार असून परशुराम सेवा संघ या बैठकीला उपस्थित राहणार नाही. पवार यांनी केलेल्याराजकारणामुळे ब्राह्मणसमाज देशोधडीला लागला असल्याचा आरोप विश्वजीत देशपांडे यांनी केला आहे.
केतकी चितळे चुकलीच
“केतकी चितळे पूर्णतः चुकली. पण आपण सुद्धा तिच्यावर टिकाच केली. पवारांनी केतकीला माफ करून जर गुन्हे मागे घेण्यास सांगितलं असतं तरं ते खूप मोठे झाले असते,” असंही दवे यांनी म्हटलंय. काही संस्था निश्चितच या बैठकीला जात आहेत. इतरांनी काय करावे हे आपण सांगत नाही,” असं दवे म्हणाले. “आपली भूमिका ठरवण्याआधी मी स्वतः सर्व विश्वस्त, कार्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांची पण मते जाणून घेतली. आज प्रवासात सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्यांना सुद्धा हेच पटत आहे,” असंही दवे म्हणाले.
पवारांना विरोध नाही पण…
“आमचा पवारांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही. त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाजसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही पण राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित,” असा आरोप दवे यांनी केला. भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत टिंगल केली. तसेच आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले,” असंही दवे यांनी म्हणत भुजबळांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
22 संघटना उपस्थित राहणार
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गरटकरांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. या बैठकीत २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार आहोत.




