बालवडकर परिवाराची वारकरी सेवेची ३२ वर्षांची अखंड परंपरा! 950 भाविकांसाठी पंढरपूर यात्रा

पुणे : विठुरायांच्या पादुकांचा स्पर्श मनाला होताच भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. माऊलींच्या नामस्मरणाने परिसर दुमदुमला आणि १९ बसेसची लांबलचक रांग पंढरपूरच्या दिशेने निघाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर बालवडकर परिवाराने वारकऱ्यांसाठी मोफत यात्रेचे भव्य आयोजन केले आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर आणि राहुलदादा बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सेवाभावी उपक्रमात यावर्षी ९५० भाविक सहभागी झाले. सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नामस्मरण, भजन आणि पूजाविधीने यात्रेची सुरुवात झाली. भक्तिभावाने भारावलेल्या वारकऱ्यांच्या मुखातून “विठ्ठला… विठ्ठला…” असा गजर उमटत होता. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, “या यात्रेच्या माध्यमातून समस्त वारकरी संप्रदायाची सेवा गेली ३२ वर्षे आमच्या हातून घडत आहे. समस्त वारकरी मायबापांचे आशीर्वाद यातून मिळतात आणि सांप्रदायिक क्षेत्राची ही सेवा करत असल्याचे समाधान मिळते.”
बालवडकर परिवाराची ही सेवा केवळ एक वार्षिक उपक्रम नाही, तर वारकरी संप्रदायाशी जोडलेली भावनिक बांधिलकी आहे. गेल्या तीन दशकांपासून ते सातत्याने भाविकांना पंढरपूर दर्शनाची संधी देत आहेत. यावेळी ज्ञानेश्वर तापकीर, सुनिलजी चांदेरे, प्रकाश तात्या बालवडकर, अनिल बालवडकर, वैशाली कमाजदार, कल्याणी टोकेकर, समस्त महिला भजनी मंडळ आणि मोठ्या संख्येने भाविक-भक्त उपस्थित होते.
बसेस रवाना होताच भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. काही ज्येष्ठ भाविकांनी सांगितले, “बालवडकर कुटुंबीयांमुळे आम्हाला दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेता येते. त्यांचे हे कार्य खरोखरच पुण्याचे आहे.”
वारकरी सेवेची ही ३२ वर्षांची परंपरा पुढीलही अनेक वर्षे चालू राहो, अशीच इच्छा सर्व भाविक व्यक्त करत आहेत. विठ्ठल नामस्मरणाने भारलेली ही यात्रा पुन्हा एकदा सिद्ध करते की, भक्ती आणि सेवा यांचा संगम हाच खरा विठ्ठलाचा मार्ग आहे.



