एमआयटी कॉलेज विरोधात स्थानिक 45 सोसायट्यांमधील नागरिक आक्रमक; रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज

पुणे: कोथरुड मधील एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वर्तनाला व रस्त्यावरील विविध समस्यांमुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या स्थानिक 45 सोसायट्यांमधील 9000 रहिवासी सर्व पातळीवर लढा देण्यास सज्ज झाले असून या लढ्यासाठी आजच्या बैठकीत कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी अनेक समस्या उपस्थित करीत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
कोथरूड मधील एमआयटी महाविद्यालय परिसरातील 45 सोसायटीतील 9000 नागरिकांनी एकत्र येत सुरू केलेल्या सिटिझन फोरम @11 या ग्रुपची हर्षवर्धन मानकर, संदीप भडकमकर, दिलीप कानडे यांच्या पुढाकारातून आज गिरिजा सोसायटीच्या सभागृहात स्थानिक समस्या सोडविण्यासाठी पत्रकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिंहासन News सह अन्य माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आक्रमक झालेल्या नागरिकांनी सर्व पातळीवर लढा देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाल्याने नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. यावेळी नागरिकांनी अत्यंत आक्रमक पणे आपली भूमिका मांडली.
एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर होणाऱ्या मद्य पार्ट्या, रस्त्यावर चालणारे अश्लील चाळे, रस्त्याने बेशिस्तपणे वेगाने वाहने चालवणे, महाविद्यालयाकडून होणारी टेकडी फोड आणि याबाबतीत पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक होणारे दुर्लक्ष यामुळे स्थानिक नागरिक या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. विश्वशांती अस जरी एमआयटीचे घोष वाक्य असलं तरी परिसरात मात्र अशांतता पसरली जात असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष येथील नागरिक या समस्या मांडत आहेत. अनेक वेळा माध्यमांमध्ये या गोष्टी आल्या आहेत मात्र तेवढया कालावधी पुरते उपाय होतात पण परत जैसे थे त्यामुळे आता सहनशक्तीचा अंत झाला असून आता रस्त्यावरची लढाई सुरू करण्याच्या तयारीत नागरिक आले आहेत. ज्यावेळी एम आय टी कॉलेज मध्ये पंतप्रधान आले त्यावेळी रस्त्याकडेच्या बेकायदेशीर गोष्टी काढून सगळे साफ केले होते. पण ते तेवढ्या दोन दिवसांपूरते होते. म्हणजे नागरिकांच्या समस्या समस्या नाहीत का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. झोपलेले प्रशासन जागे होत नाही तो पर्यंत थांबायचे नाही असा निर्धार एक मताने यावेळी करण्यात आला.






