रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामांवर नियंत्रण येणार ?

पुणे : दोन दिवसांपूर्वी येरवडा येथे स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात गरीब मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. स्लॅब कसा कोसळला, बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता किंवा कसे हे नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईलच. पण या निमित्ताने क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
संदीप खर्डेकर यांनी पत्रात असे नमूद केले की, येरवडा येथे स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात गरीब मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. स्लॅब कसा कोसळला, बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता किंवा कसे हे आपण नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईलच. पण यनिमित्ताने एक निरीक्षण नोंदवत आहे की बांधकाम प्रकल्पांवरील बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी झालेले आहेत. रात्री दृश्यमानता कमी असते आणि अश्यात निश्चितच साईट वर असणारा कमी प्रकाश, बेसावध असणारे मजूर या सगळ्याचा परिणाम हा कामावर होतोच. तसेच रात्री असे अपघात घडले की पहिले विद्युत पुरवठा खंडित होतो आणि मग मदतकार्यात देखील अडथळे निर्माण होतात. त्याच बरोबर गेल्या 3/4 महिन्यात माझ्याकडे आलेल्या बहुतांश तक्रारी ह्या अश्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाचे रात्री अपरात्री चाललेल्या कामामुळे त्रासलेल्या नागरिकांच्या आहेत.
याबाबत मनपाच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता आमच्याकडे कामाच्या वेळेबाबतची मर्यादा निश्चिती नाही व पोलिसांना ते अधिकार असून त्यांच्याकडे तक्रार करावी असे सांगितले गेले, मात्र रात्री सुरु असलेल्या बांधकामाच्या गोंगाटाने ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर परिसरातील लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी सर्वच त्रासले आहेत. तरी यावर गांभीर्याने विचार करावा व बांधकामाच्या वेळा यावर योग्य नियंत्रण आणावे तसेच ह्या सगळ्याचा सारासार विचार करून मोठा आवाज होणारी कामे ( म्हणजे खोदाई, स्लॅब भरणे, ) याबाबत बांधकाम विभागाला नियमावली करण्याच्या सूचना द्याव्यात. शक्यतो सकाळी 7 ते सायंकाळी 7/8 वाजेपर्यंतच किमान रहिवासी भागात असे नियम लागू करावेत अशी मागणी खर्डेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.




