राजेंद्र वाघ यांना हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कामगार भूषण पुरस्कार प्रदान..

पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारा कामगार भूषण पुरस्कार कमिन्स इंडिया लि. कोथरूड कंपनीमधील गुणवंत कामगार राजेंद्र वाघ यांना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन,मुंबई येथे ३४ वा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कमिन्स कंपनीतील कामगार व वारजेतील रहिवाशी राजेंद्र वाघ यांना कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र वाघ यांना आई , पत्नी व मुलगीसह पाहून हसन मुश्रीफ यांनी आईकडे लक्ष देत आहात या गोष्टीचा आनंद झाला असे विधान करून आनंद व्यक्त केला.
यावेळी प्रधान सचिव (कामगार) श्रीमती विनिता वेद-सिंगल , कामगार आयुक्त सुरेश जाधव तसेच कल्याण आयुक्त रविराज इळवे व्यासपीठावर उपस्थित होते.
कामगार हिताला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेऊ .याशिवाय शेतमजूर, वाहनचालक, यंत्रमागधारक, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणू ,अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतात यावेळी दिली.
कामगारांचे हात थांबले तर देश थांबेल , कष्टकरी समाजाला चांगले दिवस दाखवायचे असतील तर श्रमावर आधारित योजना आणायला हव्यात ,आणि कष्टकरी वर्गातील विषमतेची दरी दूर करण्याची गरज आहे, असे मत राज्य कामगार मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळलेला कामगारच 10 वर्षानंतर कामगार भूषण पुरस्कार करिता अर्ज करण्यासाठी पात्र असतो,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वतीने राज्यातील सुमारे ८० लाख संघटित कामगारांमधून दरवर्षी एकच कामगार भूषण पुरस्कार दिला जातो तर ५१ गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या कार्यक्रमात कमिन्स कंपनीमधील किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज संघटनेचे पदाधिकारी बापू सरोदे, नामदेव चव्हाण, प्रविण दरेकर ,गणेश सावंत, प्रमोद पाटील, व असंख्य मित्रपरिवार सहभागी झाले होते.









