राजकारणात प्रवेश करण्याविषयी अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली आपली भूमिका..

मुंबई : ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेता अक्षय कुमार लंडनमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय राजकारणात प्रवेश करण्याविषयी व्यक्त झाला. चित्रपटांमध्ये काम करत आणि सामाजिक समस्या असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आनंदी असल्याचं अक्षयने यावेळी सांगितलं.
अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हुंड्यासारख्या समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे. राजकारण प्रवेश करण्यापेक्षा मी चित्रपटांतूनच सामाजिक समस्या अधोरेखित करून त्यावर उपायही शोधत असल्याचं अक्षयने स्पष्ट केलं.“मी चित्रपट निर्मितीत खूप आनंदी आहे. एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शक्य तेवढं काम करतो.
आतापर्यंत मी 150 चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे ‘रक्षाबंधन’. मी अनेकदा व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करतो, तर कधी सामाजिक विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मी वर्षातून तीन-चार चित्रपटांची निर्मिती करतो. चित्रपट करत असताना मी फक्त समस्येवर बोलत नाही तर त्यावर मी उपायसुद्धा शोधतो. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उपाय सांगितला आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन या चित्रपटातसुद्धा हुंडासारख्या समस्येवर उपाय सांगण्यात आला आहे.
आपण आणि आपल्या समाजाने काय केलं पाहिजे याचं उत्तर त्यात आहे”, असं अक्षयने सांगितलं.आनंद एल. राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट येत्या 11 ‘हा’ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षयचा ‘सेल्फी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, नुशरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचासोबत त्याचा ‘रामसेतू’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. ‘मिशन सिंड्रेला’, ‘ओएमजी 2’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे अक्षयचे चित्रपटसुद्धा आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.




