वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल कोश्यारींचं अमित शहांना पत्र

मुंबई : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आणि नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारी यांना पदावरून हटवण्याचीही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी आपली बाजू मांडत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

‘महापुरुषांच्या अवमानाची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. मात्र या व्यक्तींच्या कामाचा आदर करणं म्हणजं महापुरुषांचा अनादर नव्हे,’ असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. तसंच करोना साथीच्या काळात अनेक लोक घरात बसलेले असताना मी महाराष्ट्रभर फिरलो आहे, गड-किल्ल्यांवर गेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशासाठी आहे, असंही राज्यपालांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझ्याकडून एखादी चूक झाली तर खेद व्यक्त करण्यात मला कधीही कमीपणा वाटत नाही. मात्र महापुरुषांबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशा आशयाचं पत्र भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलं आहे.



वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभर रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे याची दखल घेत कोश्यारी यांना पदावरून हटवलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर आपली बाजू मांडल्यानंतर त्यांच्यावरील संभाव्य कारवाई टळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









