ईडी, ‘सीबीआय’ला बाजूला ठेवा आणि मैदानात या; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

अमरावती : ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असं आव्हान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. माझ्यावर सातत्याने एक टीका होते की मी घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कधी कुणाची घरं फोडली नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपवर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले,”तुमचे दोन खासदार होते तेव्हा शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसवून हा महाराष्ट्र फिरवून दाखवला. हे भूत (भाजप) मानेवर बसवून सगळीकडे फिरवलं. परंतु आज तुम्ही आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात? हेच का तुमचं हिंदुत्व? हीच तुमची नीतीमत्ता आणि हीच तुमची वृत्ती!

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, मला एक गोष्ट कळत नाही. जे तुमच्या बरोबर राहिले, आम्ही २५ वर्ष तुमच्याबरोबर राहिलो, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. तुम्ही अगदी शून्य होता, तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाहीतर अटल बिहारी वाजपेयी यांनी (भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचं वरिष्ठ नेतृत्त्व) तुम्हाला तेव्हाच कचऱ्यात टाकलं होतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती होती, जी तुमच्या पाठिशी उभी होती. आत्ताच्या या पंतप्रधानांच्या पाठिशी हा एकमेव माणूस उभा राहिला. तेव्हा बाळासाहेब यांच्या पाठिशी नसते तर हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा.






नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली तिथे मोठ्या दंगली पेटल्या होत्या. जगभरातील लोकांनी, वृत्तपत्रांनी थेट नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं होतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीदेखील मोदींच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उध्दव. ठाकरे यांनी आज त्याच गोष्टीची आठवण करून दिली.






