जगदीश कदमांची कविता विवेकवादी मुशीतून आलेली – श्रीपाल सबनीस

पुणे- ‘शेतकरी,कष्टकरी समाजाचे दु:ख उजागर करणारी कविता जगदीश कदमांनी लिहिली असून ही कविता विवेकवादाचा आग्रह धरते. व्यवस्थेला प्रश्न विचारते. वैचारिक अधिष्ठान असेल तर कुठल्याही काळात लेखन शिळे होत नाही. ते सतत नित्य नूतन वाटते. कदमांची कविता या ही अर्थाने ताजी आणि टवटवीत आहे. ‘असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डा.श्रीपाल सबनीस यांनी केले.

जगदीश कदम यांच्या ‘हिशेबाची कोरी’ इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी सबनीस बोलत होते .अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले हे होते.
याप्रसंगी कवी जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सदाफुले मामांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राजेंद्र वाघ यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिमा काळे यांनी केले. या प्रसंगी पोलीस उपायुक्त किसन पवार, ललिता सबनीस, प्रभाकर वाघोले, कुमार खोंद्रे, श्रीपाद नलवानी, मृणाल जैन, धनंजय इंगळे आदी उपस्थित होते.






