पुणे शहर

पुण्यात विद्यार्थ्यांनी तयार केली भारतातील पहिली ड्रायव्हरलेस गाडी..

पुणे : Pune city एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) आणि अणुविद्युत आणि दूरसंचार (ई अ‍ॅण्ड टीसी) या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील पहिली चालकरहित, स्वायत्त, विद्युत चारचाकी गाडी तयार केली आहे.

या गाडीचे अनावरण प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख व प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ. गणेश काकांडीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थांनी चालक विरहित, स्वायत्त, विद्युत, चारचाकी आणि चार आसनी बोल्ट – ऑन ऑटोनॉमस व्हेइकलचे प्रात्यक्षिक दाखविले.

गेल्या दशकामध्ये वाहन उद्योगात भरपूर वाढ झाली, जागतिकरणामुळे सुधारलेली अर्थव्यवस्था, बँकांच्या धोरणांमुळे सहज उपलब्ध होणारे कर्ज यामुळे चारचाकी वाहन केवळ स्वप्न न राहता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले आहे. वाहनाच्या निर्मितीचा हेतू केवळ वाहतुकीचे साधन इतका मर्यादित न राहता, त्याला आरामदायक बनविण्यासाठी त्यात अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या. पेट्रोल आणि डिझेल यांची कमतरता लक्षात घेता मागच्या दोन वर्षात विद्युत वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. वाहनांना अधिकाधिक अद्ययावत बनविण्यासाठी अभियंते प्रयत्नशील आहेत, याचे पुढचे स्वरूप म्हणजे स्वायत्त, चालक विरहित वाहन ज्यावर टेस्ला आणि गूगल या कंपन्या काम करत आहेत. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला उर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी वापरण्यात आली आहे असे यश केसकर या विद्यार्थ्याने सांगितले.

Img 20210727 wa0218

या वाहनाच्या तीन उपप्रणालींवर नियंत्रण केले गेले आहे जे थ्रॉटल, ब्रेक आणि स्टीयरिंग आहेत. लिडर कॅमेरे, मायक्रोप्रोसेसर, स्वयंचलित क्रिया नियंत्रित करणारी यंत्रणा आणि विविध सेन्सर्ससह अनेक एआय आणि एमएल अल्गोरिदम वापरून स्टीयरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, असे सुधांशू मणेरीकर या विद्यार्थ्याने सांगितले. ह्या वाहनांची पावर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंग साठी चार तासांचा वेळ लागतो, ज्यात चाळीस किलोमीटर प्रवास केला केला जाऊ शकतो. अशाप्रकारच्या वाहनांचे शेती, खाण, वाहतूक क्षेत्र इत्यादींमध्ये असंख्य अनुप्रयोग आहेत, असे सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे यांनी सांगितले.

प्रा. प्रकाश जोशी म्हणाले, चालक विरहित स्वायत्त वाहन विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे स्मार्ट सिटी आणि मेट्रो व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांनी या वाहनाचे अनुलोकन करून याचा पुणेकरांच्या सेवेसाठी उपयोग होईल. प्रा. डॉ. गणेश काकांडीकर म्हणाले, अशा प्रकारच्या विद्युत वाहनांचा उपयोग मेट्रो स्थानकांना संलग्नित क्षेत्राशी जोडण्यासाठी, दळणवळणाकरिता, एअरपोर्ट, गोल्फ क्लब, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी करता येईल.

या प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रा. श्रीकांत यादव आणि प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी. राव व इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये