महाराष्ट्र

बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे – अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई : सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावी;उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी केली आहे.(Belgaum should be a united Maharashtra with Karwar – Ajit Pawar’s demand to Prime Minister Modi)

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

Img 20210727 wa0218

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत असेही पत्रात अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे.सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत असेही अजितदादा पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी अशी विनंती अजितदादा पवार यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह  संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजितदादा पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये