ठाकरे गट आणि ‘आप’ युतीवर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गट आणि आम आदमी पक्षाची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान केलं आहे.
ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीशी युती केल्यानंतर निश्चित परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर होणार असल्याचे मानले जात आहे. त्यातच आता आम आदमी पक्षही या युतीत सामील होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
निवडणुकीचा नाही देशातील युवकांचा विचार
येत्या काळात आम आदमी पक्ष आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे का? असं विचारलं असता अरविंद केजरीवाल म्हणाले, ” देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली.”
पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू… आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या पक्षाप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत, असा टोला अरविंद केजरीवालांनी भाजपचं नाव न घेता लगावला.




