चंद्रकांत पाटील यांनी मध्ये पडू नये : संजय राऊत

मुंबई : किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षात साडेसात हजार कोटी जमा केलेत असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. चंद्रकांत पाटील वगैरे भाजपचे काही नेते मध्ये पडत आहेत. पण त्यांनी मध्ये पडू नये अन्यथा उघडे पडतील. उगाच या प्रकरणात पडू नका. लोक सोमय्यांची धिंड काढणार असून त्यात तुम्ही सहभागी झालात तर लोक तुमचेही कपडे काढतील, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून त्यांना राऊत यांनी चोर आणि लफंगादेखील म्हटलं आहे. फडणवीसांच्या नावाने किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी 433 बोगस लोकांना घुसवलं, प्रत्येकी 25 लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत व त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा 200 ते 300 कोटींचा घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

“किरीट सोमय्यांनी फक्त ईडीच्या नावे नव्हे तर फडणवीसांच्या नावेदेखील वसुली केली आहे. त्यांनी फडणवीसांना 50 कोटी देणार असल्याचं सांगितलं होतं,” असा आरोप संजय राऊतांनी केला. “आपल्या मागे काय चाललंय हे फडणवीसांनी माहिती नसावं. असे घोटाळे फडणवीस करतील असं मला वाटत नाही. पण त्यांच्या नावे हा घोटाळा करण्यात आला असून संबंधित सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनाही भेटून या सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“मी जुहूबद्दल सांगितलेल्या प्लॉटची माहिती समोर येईल. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. आता मी रोज भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे. लोकं समोरुन येऊन माहिती देत असून किरीट सोमय्यांची एकूण 211 प्रकरणं समोर आली आहेत. किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे कोट्यवधी रुपये जमा केले असून हे रेकॉर्डवर आहे. जे करायचं ते करा. जो उखाडना है उखाडलो,” असं संजय राऊत म्हणाले.
“विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे मागच्या सरकारमधील महाआयटी घोटाळ्याच्या आरोपींना पळवून लावलं गेलं आहे. केंद्र सरकारला आम्ही अमोल काळे व इतर कुठे आहेत याबाबत विचारणा करु. 25५हजार कोटींचा घोटाळा आहे. त्याचं मनी लाँण्ड्रिंग झालं आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.



