वेताळ टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी पुणेकर आक्रमक ; पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ; वेताळ टेकडीवरून करण्यात येणाऱ्या नियोजित बालभारती पौड रस्त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार असल्याने त्याला विरोध दर्शवण्यासाठी पर्यावरणप्रेमी पुणेकर भर पावसात रस्त्यावर उतरले. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत विविध सामाजिक संघटना, पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
वेताळ टेकडी भूत नव्हे देवदूत, रस्ता नको टेकडी हवी, वेताळ टेकडी वाचली पाहिजे, वेळ काहीतरी करण्याची वेताळ टेकडी वाचवण्याची, आमचे घर तोडू नका अशा घोषणा देत पुणेकर सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौक ते बालभारती येथील खांडेकर चौक या दरम्यान काढलेल्या टेकडी बचाव मोहिमेसाठी काढलेल्या पदयात्रेत सहभागी झाले होते. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बालभारती पौड रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया महापालिकेने राबवली, त्यानंतर पर्यावरण प्रेमी पुणेकर आक्रमक झाले आहेत.
आजच्या वेताळ टेकडी बचाव मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भाजप नेते या रस्त्याच्या कामाला आग्रही असल्याने इतर राजकीय पक्षांनी या कामाला विरोध दर्शवला असून राजकीय पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले होते.
बालभारती पौड रस्ता, सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदे असे हे तीनीही प्रकल्प पुण्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याने ते विकास आराखड्यातून काढून टाकावेत. वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा जाहीर करून पूर्ण टेकडीला शून्य विकास क्षेत्र म्हणून जाहीर करावे अशा मागण्या पर्यावरण प्रेमी पुणेकरांकडून करण्यात येत आहेत.
पुणेकर पर्यावरण प्रेमी मंडळी बरोबरच खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाबा धुमाळ, हर्षवर्धन मानकर, शिवसेना (उद्धव ठाकरे)चे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, गजानन थरकुडे, मनसेचे हेमंत संभुस, आपचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.




