वारजेत आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब ; नातेवाईकांकडून केला जातोय आरोप

वारजे : वारजे परिसरात ९ मे रोजी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याने संबधित महिलेने आत्महत्या केल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीतून पुढे आले होते. मात्र आत्महत्या होऊन १३ दिवसानंतर ही वारजे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला गेला नसल्याने या प्रकरणात पोलीस संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.
वैशाली गायकवाड दिघे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून त्या वारजे येथील माई मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नोकरीला होत्या. नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याने त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून पुढे आले आहे. त्यांनी लिहिलेल्या नोट मध्ये त्रास देत असलेल्या व्यक्तींचीही नावे त्यांनी दिलेली आहेत.

या घटनेनंतर वैशाली गायकवाड दिघे, यांचे पती सुनील दिघे यांच्याकडून वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र घटनेस १३ दिवस होऊनही वारजे पोलिसांकडून अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सुनील दिघे म्हणाले, प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही तपास करत आहोत, चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना अटक व्हायला हवी होती पण पोलिसांकडून वेळ लावला जात आहे.
याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांना संपर्क साधला असता त्यांनी घटनेची सखोल चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारची टाळाटाळ होत नाही. शेवटच्या स्टेजला आम्ही आलो असून लवकरच कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
एकूणच तीन दिवसांपूर्वी कल्याणीनगर येथे एका बड्या बिल्डरच्या मुलाने आलिशान कार भरधाव वेगाने चालवत दोघांना उडवले होते. या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर शहरभरातून टीकेची झोड उठली होती. तसाच प्रकार वारजे परिसरात सुरू असून पोलिसांकडून कारवाई करण्यास का वेळ लावला जात आहे असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.









